खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर; मायणीत शेतकरी मेळावा
मायणी – खटाव आणि माण या तालुक्यांमध्ये रस्ते, पाणी आणि उद्योगधंदे सुरू करून, दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न आमदार जयकुमार गोरे व मी सातत्याने करत आहे. राजकीय स्वार्थासाठी आपल्या जिल्ह्यातील पाणी बारामतीला देऊन, संबंधितांनी मातीशी गद्दारी केली.
तेच विकलेले पाणी आम्ही 3200 कोटी रुपये मंजूर करून परत फलटणला आणले. या भूमीत कॉरिडोर उभा राहत असून, उरमोडी योजनेचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध होणार आहे. या दुष्काळी तालुक्यात विमानतळ उभारण्याचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
मायणी, ता. खटाव जिल्हा परिषद गटातील शेतकर्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, जिल्हा चिटणीस जयकुमार शिंदे, खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य मेधा पुकळे, वडूजच्या नगराध्यक्ष मनीषा काळे, रामभाऊ देवकर, रघुनाथ घाडगे, भाजपचे मायणी शहराध्यक्ष जालिंदर माळी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हा साडेतीन वर्षांत या भागात पाणी आणण्याचे जाहीरनाम्यात सांगितले होते आणि ते करूनही दाखवले. 2019 मध्ये विखळे येथे सर्वपक्षीय पाणी परिषद झाली. त्यावेळीही 16 गावांना टेंभूचे पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. या परिसरातील सोळा गावे आणि मांडवे, तडवळे परिसरातील गावांचा समावेश केला असून, अडीच टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. शिवाय 700 ते 750 कोटी रुपयांचे काम असून, याची निविदा पंधरा-वीस दिवसांत निघणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आसपास कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मी विकासाचे राजकारण करणारा कार्यकर्ता आहे.
डॉ. येळगावकर म्हणाले, आपल्या जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इतर जिल्ह्यांमध्ये गेले. उरमोडी, तारळी, टेंभू योजनांचे पाणी या भागाला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी निवडणुकीत तीस ते चाळीस हजार मताधिक्य देणार असून, तसे न झाल्यास राजकारण सोडेन. यशोदीप पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या 15 कोटींच्या ठेवी परत दिल्या आहेत. धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण यांची भाषणे झाली.