कोरेगाव तालुका वकील संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
कोरेगाव – राहुरी (जि. अहमदनगर) येथील अॅड. राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. मनीषा यांचे अपहरण करून, निर्घृण खून केल्याची घटना दि. 25 जानेवारीला घडली. या घटनेचा कोरेगाव तालुका वकील संघाच्यावतीने निषेध करण्यात आला.
याबाबत प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे व निवासी नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुहास भंडारे, सचिव अॅड. रोहिदास बर्गे व संघाचे सदस्य उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, आढाव दाम्पत्याच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करावी. वकिलांच्या संरक्षणाचा कायदा मंजूर करावा. ज्या वकिलांनी मागणी केली आहे, त्यांना तातडीने शस्त्र परवाने द्यावेत.
राहुरीतील आढाव कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी. राज्यातील वकिलांना 25 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण राज्य सरकारमार्फत देण्यात यावे. तत्पूर्वी, वकील संघाच्या कार्यालयात झालेल्या शोकसभेत आढाव दाम्पत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेत करण्यात आलेले ठराव राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.