सातारा – केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत प्रेरणा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय एक, सीबीएसइचे १३ व शासनाच्या ११ विद्यालयांनी प्रेरणा उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.
वडनगर (गुजरात) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावी असलेल्या त्यांच्या शाळेत मुलांना घेऊन जाऊन तेथील आदर्श घेण्याकरीता प्रेरीत केले जाणार आहे. मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्याकरीता निवड झालेल्या मुलांना खेळ, विज्ञान, कला, कौशल्य, स्वओळख, स्वाभिमान, संस्कृती, पारंपरिक उत्सव याची माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उडीसा व मध्य प्रदेश या पाच राज्यांतून विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन, कविता लेखन व चित्रकला स्पर्धा घेण्याचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यातून राबविण्यात आला. येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए. जे. यांनी साताऱ्यातील विद्यालयांना पत्र पाठवून सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यानुसार जवाहर नवोदय विद्यालय एक, सीबीएसइचे १३ व शासनाच्या ११ विद्यालयांनी सहभाग घेतला. यावेळी प्रेरणा उत्सवाची फिल्म दाखविण्यात आली. प्रेरणा उत्सव समन्वयकाची भूमिका उपप्राचार्य राजुल शामकुंवर यांनी यशस्वी केली. यातून पंधरा मुले व पंधरा मुलींची निवड करण्यात आली. निवडलेल्या मुला-मुलींची नावे केंद्राच्या शिक्षण मंत्रालयातील प्रेरणा उत्सव समितीकडे पाठविण्यात आली आहेत. तेथे पाच राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील निवड झालेल्या पंधरा मुले व पंधरा मुलींपैकी केवळ एक मुलगा व एक मुलीची निवड करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या मुलांना ७ दिवसांकरीता वडनगर येथे पंतप्रधान मोदी यांच्या गावच्यात्यांच्या शाळेत राहण्याचा व विविध खेळ, विज्ञान, कला, कौशल्य, स्व ओळख, स्वाभिमान, संस्कृती, पारंपरिक उत्सवाचा लाभ घेता येणार आहे. निबंध लेखन, कविता लेखन व चित्रकला स्पर्धेच्या परीक्षणाचे कार्य दत्ताप्रसाद पाडुळे, श्रीमती मृणालिनी विजय कासुर्डे, हरि नारायण जोशी, मुकेश पूर्वा, प्रतिक प्रताप भोसले व श्रीमती अंजली राजेंद्र पाटील यांनी पूर्ण केले. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पानकर फकीराप्पा हिरपूर, हरि नारायण जोशी, जॉर्ज जोसेफ, मुकेश पूर्वा, श्रीमती समता सुरेंद्र जगदेकर, श्रीमती स्नेहल अतुल निकुंभ व मनीष आंबेकर यांनी घेतल्या.