म्हसवड – पर्यंती, ता. माण येथील संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय 75) आणि नंदाबाई भिकू आटपाडकर (वय 58) या मायलेकीचा बुधवारी (दि. 20) रात्री अज्ञाताने गळा आवळून निर्घृृण खून केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. या दुहेरी हत्याकांडाने माण तालुका हादरला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन, श्वानपथकास पाचारण केले. या प्रकरणातील संशयितांचा पोलिसांनी तात्काळ शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
याबाबत घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पर्यंती येथील संपदाबाई नरळे आणि नंदाबाई आटपाडकर या मायलेकी एकत्र रहात होत्या. त्या गावातच छोटे किराणा दुकान चालवत होत्या. त्यांचे गावातील सर्वांशी सलोख्याचे संबध होते. दोघी विधवा होत्या. संपदाबाईंना तीन मुली व दोन मुले असून, एक मुलगा पुण्यात नोकरी करत आहे. दुसरा मुलगा पर्यंती गावातच वेगळा राहून शेती करत आहे. नंदाबाई यांना मूलबाळ नसून, दोन सावत्र मुले आहेत. ती घरापासून काही अंतरावर रहात आहेत.
नंदाबाईंची नात भारती दाजीराम नरळे (वय 18) गुरुवारी सकाळी 7 वाजता किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आली असता, तिला दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले. तिने आजीला हाक मारली, पण आतून कोणीच आवाज देत नाही, हे पाहिल्यावर तिने घराचे दार ढकलले. त्यावेळी मायलेकी मृतावस्थेत दिसल्या. नातीने ही घटना पोलीस पाटलांना सांगितली. पोलीस पाटलांनी याची खबर म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी विभूते यांना दिली. पोलीस उपनिरीक्षक रवी डोईफोडे यांनी याबाबतची माहिती दहिवडीचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांना दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले. श्वानाने पर्यंतीपासून दोन किमी अंतरावरील मुल्ला वस्तीपर्यंत माग काढला. या दुहेरी खुनाचे कारण अस्पष्ट असून, तपास सुरू आहे.