श्रीगोंदा – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. यानुसार तुमच्या मुलांना शिक्षण द्या, नोकरीला लावा, पोलीस, डॉक्टर, इंजिनियर बनवा. सर्वसामान्य लोकांच्या प्रवाहात या म्हणजे परिवर्तन नक्कीच घडेल, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विभागीय पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी. शेखर पाटील यांनी केले.
श्रीगोंदा शहरातील पंतनगर येथील नगरपालिका सभागृहात आदिवासी समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेखर पाटील होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक रामराव ढिकले प्रमुख उपस्थित होते.
महानिरीक्षक शेखर पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्यातील १५ वर्ष परांगदा असलेले आदिवासी बांधव पोलिसांच्या धास्तीने कुटुंबापासून दूर होते, परंतु या सर्व आदिवासी बांधवांच्या मागे लागलेला ससेमिरा बंद केला. त्यामुळे ते आज आनंदाने कुटुंबासोबत राहत आहेत. समाजातील कोणत्याही तरुणाने व्यसनाधीनता व चोऱ्यामाऱ्यांपासून दूर राहिले पहिले तसेच एकमेकांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत. आमचे पोलीस पडताळणी केल्याशिवाय गुन्हे दाखल करणार नाहीत. पोलीस तुमच्यासाठी आहेत, असेही सांगितले. यावेळी किसन चव्हाण, नामदेव भोसले, गटविकास अधिकारी राणी फराटे यांची भाषणे झाली. राजेंद्र काळे यांनी आभार मानले. यावेळी उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक समीर अभंग, संपत कण्हे, कृषी अधिकारी डॉ. राम जगताप, अजित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.