कराड – राज्यात जी शासकीय रुग्णालयाची व्यवस्था कोलमडली आहे, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. शासकीय रुग्णालयांच्या अवस्थेचा प्रश्न कराडचा तर आहेच. परंतु, राज्याचा सुद्धा प्रश्न असाच आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची पदे भरण्यात शासनाने गलथान पणा केला आहे. त्यामुळेच राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. राज्य व केंद्र सरकारची सगळीकडेच कंत्राटी पद्धत अवलंबायचे धोरण सुरु आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या कोलमडलेल्या व्यवस्थेला शासनच जबाबदार आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
नांदेडसह राज्यातील इतर जिल्हा रुग्णालयांची व्यवस्था कोलमडून जीवितहानी झाली होती. त्या अनुषंगाने आ. चव्हाण यांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टर व इतर स्टाफची अपुरी संख्या, रुग्णालयातील सुविधा, समस्या या सर्व बाबींचा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. राजेश शेडगे यांच्याकडून आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, जावेद शेख, शुभम लादे आदी. उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. अशा रुग्णांची पुरेसा स्टाफ व डॉक्टर नसल्याने गैरसोय होत असते. यामुळे जोपर्यंत पूर्णवेळ जबाबदार डॉक्टरांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था किती दिवस अवलंबायची हा प्रश्न अनुत्तरित आहे. रुग्णालयाची इमारत 60 वर्षे जुनी असून या इमारतीची डागडुजी व कालांतराने नवीन इमारत बांधणे अत्यावश्यक आहे.
आ. चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेताना रिक्त डॉक्टरांच्या पदाबाबत मागणी प्रस्ताव सादर करून प्रश्न मार्गी लावावा, उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडचे रुग्णालय असून सध्या 164 बेडद्वारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजून 50 बेड मंजुरीसाठी अवश्यकता आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याबाबत आ. चव्हाण यांनी सूचना केल्या. तसेच स्वच्छता सेवेसाठी किमान 14 स्वच्छता सेवकांची आवश्यकता, कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे मे 23 पासून सप्टेंबर 23 अखेरचे वेतन अनुदान प्राप्त नाही,
तज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्ण तपासणीत अडचणी, नियमित डयूटीसाठी फक्त 5 वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध, तीन रुग्णवाहिका आणि फक्त एकच कंत्राटी तत्वावर वाहनचालक उपलब्ध, सोमवार/मंगळवारसाठी पाटणच्या वाहनचालकाची नियुक्ती, एक वाहन विनावापर पडून असल्याने रुग्ण सेवेत अडथळा, रुग्णवाहिकेअभावी रुग्णांना (बाळंतपण) ने-आण सुविधा पूर्ण ताकदीने देता येत नाहीत. आदी. बाबी निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, प्रहारचे मनोज माळी यांनीही कराड उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनतर या सर्व बाबींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.