कराड -धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यास सन 2022-23 मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन 50 रुपयांप्रमाणे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. येत्या 27 ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, यामुळे जयवंत शुगर्सच्या ऊस उत्पादकांना गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी मिळणारी एकूण रक्कम 3001 रुपये इतकी होणार आहे.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जयवंत शुगर्सच्या 13 व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. “जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बॅंकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी.एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन.एम. बंडगर आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जयवंत शुगर्सची गत गळीत हंगामाची एफआरपी प्रतिटन 2940 रुपये होती. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, एफआरपीपेक्षा जादा रक्कम म्हणजेच प्रतिटन 2951 रुपयांचे पहिले ऊसबिल अदा केले होते. कारखान्याची गत गळीत हंगामाची सांगता 22 मार्च रोजी झाली. हंगामाची सांगता झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून एफआरपीची सर्व रक्कम अदा करण्यात आली होती.
आता प्रतिटन 50 रुपयांचे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय डॉ. भोसले यांनी जाहीर केला असून, येत्या 27 ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या गळीत हंगामातील उसबिलाची एकूण रक्कम 3001 रुपये इतकी होणार आहे. प्रारंभी, चेअरमन चंद्रकांत देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रशिला देसाई यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले. कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
===================