सातारा – महावितरणने नुकत्याच अदा केलेल्या शेतीपंपाच्या बिलावरुन कारभारातील सावळा गोंधळ दिसून येत आहे. अश्वशक्ती व रिडिंगप्रमाणे बिले आकारली असून अश्वशक्तीची बिले वाढीव आहेत. यंदा पाऊस कमी असून गेले काही महिने विहिरीत पाणीसाठा कमी असताना बिले वाढवून कशी आली, अशी शेतकऱ्यांतून विचारणा होत आहे. या बिलांबाबत संभ्रमवस्था असून वाढीव वीजबिलामुळे आर्थिक भुर्दंड कशासाठी, असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
महावितरणने शेतीपंपाची नुकतीच बिले दिली असून शेतकऱ्यांच्या हाती ती आली आहेत. दर तीन महिन्यांला बिले आकारून येतात. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी खासगी विहिरी आणि बोअरवेलला वीजपुरठा होतो. सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव वीजबिलाचा झटका नित्याचाच बनला असून बिलावरील आकड्यातील त्रुटीमुळे आताच्या आलेल्या बिलाबाबत सावळा गोंधळ दिसून येत आहे. ही बिले संभ्रम निर्माण करणारी असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे.
वीज बिलावर वाढ झाली असून कसलेही रिडिंग त्यावर नाही. अंदाजे बिले आकारली असल्याने अनेक प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तीन एचपीच्या पंपाला यापूर्वी 1200 ते 1300 रुपये बिल येत होते. मात्र, तेच बिल दोन हजारांवर गेले आहे. रीडिंगप्रमाणे बिलांची आकारून मिळावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अनेक शेतकऱ्यांना अश्वशक्तीप्रमाणे बिले आली आहेत. बिलात 14 फेब्रुवारीला 1260 त्यानंतर 11 मे रोजी 1820, 1 नोव्हेंबरला 4250 रुपये आकारले आहे. अन्य परिसरात रीडिंगच्या बिलाचा आकार कमी आहे. त्यामुळे रीडिंगप्रमाणे बिले आकारून मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.