करोना काळात अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना सवलत द्यावीच लागणार
पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची शुल्कमाफ संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजेच पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत आहे. मात्र, काही महाविद्यालयांनी फक्त एकच वर्ष याची अंमलबजावणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने अनाथ मुलांचे संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क माफ करण्याचे निर्देश विद्यापीठ व संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत.
यासंदर्भात उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व विद्यापीठांकडून अहवाल मागितला आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. देवळाणकर यांनी सर्व विद्यापीठांना पत्र धाडले आहे. यात 28 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत कुलगुरू यांनी दिलेल्या सहमतीनुसार राज्यातील सर्व विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचे आई, वडील, पालक करोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच संपूर्ण शुल्क माफ करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत गेल्या तीन वर्षात किती विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे, याबाबतची वर्षनिहाय माहिती उच्च शिक्षण संचालनालयास पाठवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता कार्यवाही करावी लागणार आहे.
हे शुल्क माफ होणार
जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, युथ फेस्टिव्हल या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आले नाही. त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क संपूणपणे माफ करावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
परीक्षा अर्जास अडवू नये
सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क 3 ते 4 टप्यात भरण्याची सवलत देण्यात यावी. तसेच शुल्क थकीत असेल तर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये, असेही उच्च शिक्षण विभागाने निर्देश दिले आहेत.