किवळ येथील बैठकीतील सूर; नामदार रामराजे निंबाळकर पालकमंत्री बाळासाहेब पाटील व मान्यवरांची उपस्थिती
मसूर (वार्ताहर) – सर्वसामान्य शेतकर्यांची अर्थवाहिनी असणार्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सातारा ची निवडणूक जाहीर झाली असून, ही निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वपक्षीय हितचिंतकांचा विचार घेतला जाणार आहे, निवडणुकीचे नेतृत्व जिल्ह्याचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर व सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील करणार आहेत, अशी चर्चा किवळ ता.कराड येथे माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे यांच्या शेतावर स्नेहभाजनाच्यावेळी मर्यादित कार्यकर्त्यांसमवेत झाली.
सुमारे दिड ते दोन तास चाललेल्या गोपनीय बैठकीस ना.रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, विधानपरिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सातारा जिल्हा मध्य.सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, बॅंकेचे संचालक नितीन पाटील आदि उपस्थित होते. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. उमेदवार निवडीबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय करून घेतला जाणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासन उत्तम असून, बॅंकेचा नावलौकीक संपूर्ण भारतात आहे. बॅंकेस उच्चतम कार्यक्षता व आर्थिक व्यवस्थापणाचे नाबार्डचे पुरस्कार मिळाले आहेत. बॅंकेच्या सुलभ कर्ज ध्येय धोरणामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्यांची आर्थिक सबलता वाढली आहे, असे नामदार रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे काम उत्तमरित्या चालू असून, निवडणुकासाठी कौशल्य वापरून सर्व पक्षांतील सदस्यांना व हितचिंतकांना बरोबर घेऊन बॅंकेची निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्याकडे दिली आहे, त्यानुसार मी सर्व पक्षातील हितचिंतकांचा विचार घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. यापुढील ध्येयधोरणे बॅंकेच्या हिताची ठरतील असे सर्वानुमते निर्णय घेणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे सहकाराचे खरेखुरे उद्धिष्ट, सहकारातून कृषी औद्योगिक क्रांती आणि बॅंकेचे ग्राहक व सभासद शेतकरी आर्थिक सबल होणार आहेत. असे मत नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
तानाजीराव साळुंखे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाप्रसंगी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सदस्य जितेंद्र पवार, सह्याद्रिचे संचालक संजय थोरात,
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.विजय साळुंखे, शिरगावचे माजी सरपंच मानसिंग मोहिते, निवासराव पाटील, खोडजावाडीचे माजी सरपंच महेंद्र मांडवे, तसेच किवळ व खोडजाईवाडी चे जेष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते. किवळचे माजी सरपंच सुनील साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.