सातारा (प्रतिनिधी) – दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. भीती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
“मरकज” या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील ७ नागरिक आणि मरकजशी निगडीत असलेल्या ५ नागरिकांची नावे आली होती. त्या सर्वांच्या स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन. आय. व्ही. कडे पाठविले होते. त्या बारा जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.