सातारा -शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी महावितरणकडून मीटर मिळत नसल्याने कृषी समिती सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतातील विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर बिलाची सक्ती करु नका, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. याबाबत अधिक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा सोमवारी सभापती धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, प्रतिक कदम, प्रकाश चव्हाण, सुरेखा जाधव, शंकर खबाले- पाटील, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर आदी उपस्थित होते. शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी विद्युत मीटर उपलब्ध होत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. घरगुती मीटर टेस्टिंगसाठीही विलंब लागत असून याबाबत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली.
महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांशी याबाबत संपर्क साधून सदस्यांच्या मागणीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना मंगेश धुमाळ यांनी केली. त्यानुसार शेतीपंपासाठी मीटरची उपलब्धता करण्याचे आश्वासन महावितरणच्यावतीने देण्यात आले.
शेतीपंपासाठीचा विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्यानंतरही शेतकऱ्यांकडे सरसकट वीज बिलाची सक्ती होत आहे. वीज बिल थकित आहे तो ट्रान्सफार्मर बंद करण्यात येत आहे. वास्तविक नियमित वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याची भावना सदस्यांनी मांडली. याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड होणार नाही, त्रास होणार नाही यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रस्त्याकडेला लावलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने झाडे जळून जात असल्याची तक्रार सदस्यांनी केली. शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सामाजिक वनीकरण विभागाकडून सांगण्यात आले. विजय माईनकर यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला.