सातारा – राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयीन युवक युवतींशी दिलखुलास संवाद साधला. युवकांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
हा संवाद मेळावा प्रा. दशरथ सगरे यांच्या यशोदा टेक्निकल कॅम्पस इन्स्टिट्यूटच्या दालनामध्ये रंगला. यावेळी दोनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते यशोदा टेक्निकल कॅम्पसचे अध्यक्ष दशरथ सगरे, लोकसभा संयोजक सुनील काटकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, विनीत पाटील, अजिंक्य सगरे, यशोधन सगरे, अमित कुलकर्णी, तालुकाप्रमुख विक्रम बोराटे, डॉ. वीरेंद्र घड्याळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
यशोदा शिक्षण संस्थेच्या वतीने खासदार उदयनराजे यांचा सत्कार दशरथ सगरे यांनी केला. भाजयुमोचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खा. उदयनराजे यांच्या आगमनाने विद्यार्थी हरकले होते. विद्यार्थ्यांनी उदयनराजे यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. भारतापुढे अनेक आव्हाने असून ती आव्हाने पेलण्याची ताकद युवकांच्या मनगटामध्ये आहे. युवकांची रचनात्मक विचारसरणी ही राजकीय प्रक्रियेतून घडते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी मतदानाचा हक्क निश्चित बजावला पाहिजे. युवा मतदानाचा टक्का हा भारताला निर्णय टप्प्याकडे नेऊ शकतो असेही त्यांनी सांगत नवीन मतदारांना त्यांनी राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा दिल्या.