सातारा – प्रशासनाच्या ढिलाईमुळे जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत असतानाही जिल्ह्यात करोनाबळींची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 17 करोनाबाधित मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मल्हार पेठ, सातारा येथील 82 वर्षीय महिला, गोवे, ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, देगाव फाटा, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दहिवडी, ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष, नाझरे, ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना कोपर्डे हवेली, ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष, घोलपवाडी, ता. कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण येथील 62 वर्षीय महिला, बोबडेवाडी, ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, तांबवे, ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, कोयना वसाहत, ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, कोपराळे, ता. खटाव येथील 39 वर्षीय युवक, मंगळवार पेठ, फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, वाईतील 60 वर्षीय पुरुष, फुलेनगर, वाई येथील 60 वर्षीय महिला, वाईतील 62 वर्षीय पुरुष, अशा 17 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
983 जणांना डिस्चार्ज
सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून सोमवारी संध्याकाळपर्यंत 983 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 805 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 70, कराड 19, फलटण उपजिल्हा रुग्णालय 50, कोरेगाव 49, वाई 83, खंडाळा 79, रायगाव 97, पानमळेवाडी 46, मायणी 28, महाबळेश्वर 50, पाटण 10, दहिवडी 42, खावली 17, तळमावले 31 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 134 अशा एकूण 805 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.