नाशिक : आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. यासंदर्भात महत्वाचं अपडेट समोर आले असून नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
आयोजकांकडून सांगण्यात आले आहे की, अध्यक्ष नारळीकर यांना आणण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते येणार नाहीत. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. ते ऑनलाईन हजेरी लावतील अशी माहिती आहे. माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये संमेलनाचा उत्साह आहे. थंडीच्या वातावरणात देखील साहित्याच्या या मेळ्यात लोकांनी भरभरुन सहभाग घेतला आहे, असे ते म्हणाले. हा उत्साह शेवटच्या दिवसांपर्यंत कायम राहील, असे देखील भुजबळ म्हणाले.
आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासमोर अनेक संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी वेगवेगळे वाद मग कोरोनाचं संकट, कोरोनामुळं बदललेल्या तारखा आणि नंतर नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट यामुळे अनेक विघ्नं या संमेलनाच्या वाटेत आली.
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.