जळगाव – राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. रस्ते अपघातात अनेकांचे जीव जात आहेत. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. भरधाव येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. या महिलेच्या मुलाचे दोन दिवसांवरच लग्न होते. या आनंदाच्या वातावरणात आईचा मृत्यू झाल्याने या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भावना भारत सुपे, वय 40 असे अपघातात मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. त्या वाघोदा येथील रहिवासी होत्या. विद्या काशिनाथ सुपे, क्रीष्णा सुपे यांच्या सह अन्य् दुसऱ्या कारमधील काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घरात लग्न असल्यामुळे खरेदीसाठी चारचाकी वाहनाने सुपे यांच्या परिवारातील काही जण जळगाव येथे जात होते. दरम्यान भिकनगाव पाल आमोदा महामार्गावर सावदा- पिंपरुळ दरम्यान त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. कारची समोसमोर धडक होऊन नवरदेवाच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य् दोन जखमी झाले.
येत्या रविवारी (दि.5) रोजी सुपे यांच्या कुटूंबात लग्नानिमीत्ताने रिसेप्शन सोहळा होता. घरात या सोहळ्याची तयारी सुरु होती. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. अशा आनंदी वातावरणात ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे सुपे परिवाराच्या आनंदावर विर्जन पडले आहे.