जुन्नर – अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांचे विशेषतः जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कड्यांना इजा झाल्यामुळे आधीच काही भागात घडनिर्मिती झाली नव्हती.
ज्या भागात काही थोड्या-फार प्रमाणात घडनिर्मिती झाली त्या भागातील बागा आता फुलोरा अवस्थेत असताना काल झालेल्या अवेळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. जुन्नर तालुक्यातील सरसकट सर्वच बागांवर डाऊनी व करपा रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये डाऊनीमुळे घड कुजण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तर करप्यामुळे मणीगळ होऊन पाने खराब होत आहेत. त्यामुळे बागांवर आवश्यक औषधे फवारणी करूनही बागा वाचवणे आता शेतकऱ्यांच्या हातात राहिले नाही. अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जितेंद्र बिडवई यांनी दिली.
दोन हजार हेक्टरला फटका
जुन्नर तालुक्यात द्राक्ष पिकाखाली सुमारे दोन हजार हेक्टर एवढे मोठे क्षेत्र असून, शरद व जम्बो सीडलेस द्राक्षांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश बागा या फुलोरा अवस्थेत असताना अवेळी झालेल्या पावसामुळे घडांमध्ये पाणी साचून मणी कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हातातून जाणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल आहे. तीन हवामान झोनमुळे जुन्नर तालुक्यातील सध्याची पर्जन्य मापके कमी पडत आहेत. त्यामुळे विमा परतावाबाबात शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून यावर्षी फळपीक विमा योजनेत सहभाग नाही.
– सतीश शिरसाट, तालुका कृषी अधिकारी जुन्नर
गेल्या तीन वर्षांपासून गारपीट अतिवृष्टी निसर्ग चक्रीवादळ लॉकडाऊन कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. द्राक्ष पीक हे खूप भांडवली पीक आहे तरी शासनाने ताबडतोब द्राक्षबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
– जितेंद्र बिडवई, संचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे
गेल्या काही वर्षांत अनेकदा नुकसान होऊनही शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ झालेला नाही. कारण शासन महसूलमध्ये असलेल्या हवामान केंद्राचा हवामानाचा अंदाज विमा कंपनीला कळवते; परंतु प्रत्यक्ष गावांमध्ये किंवा द्राक्ष पीक असलेल्या भागांमध्ये पाऊस होऊन
मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असते, तर हवामान केंद्राच्या ठिकाणी पाऊस झालेला नसतो, अशावेळी शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते, त्यावेळी कृषी विभागामार्फत नुकसान याची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.
– दीपक कोकणे, द्राक्ष उत्पादक