Grampanchayat Election – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्यातील निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवर सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (Ncp) बाहेर पडल्यावर अजित पवारांनीही (Ajit Pawar) चांगलीच मुसंडी मारली आहे. भाजपनंतर अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे.ग्रामपंचायतीच्या निकालानंतर (Grampanchayat Election Result) राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील या निकालानंतर सोशल मीडियावरून आपले मत व्यक्त केले आहे.
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर गावकऱ्यांना दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांचा कारभारी मिळाला. यामध्ये 600 पेक्षा अधिक जागा मिळवून भाजपने अव्वल क्रमांक पटकवला. संपूर्ण जागेचे निकाल हाती आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपसह महायुतीचे वर्चस्व आल्याची चर्चा सुरु झाली. अशात काळ मोठा कठीण आला आहे.राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी ग्रामपंचायत निकालावर भाष्य केले.
संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये राऊत म्हणतात,”काळ मोठा कठीण आला आहे.राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.मुंबई सह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते.ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच !”
काळ मोठा कठीण आला आहे.
राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.
ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.
जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका… pic.twitter.com/PeIjd0P7Ge— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2023
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…
ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मतदारांनी त्यांचा कौल दिलाय. त्यासाठी मी मतदारांचे आभार मानतो. मागील वर्षभरात महाविकास सरकारने थांबवलेली कामे ही महायुतीच्या सरकारने पूर्ण केली.या प्रकल्पांना चालना देऊन आम्ही राज्याचा सर्वांगिण विकासाचे काम केले. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहचले आहे. हे सर्व मतदारांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले अशा भावना मुख्यमंत्री शिंदेंनी ग्रामपंचायत निकालानंतर व्यक्त केल्या.