मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे रात्रीपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये पोलिसांच्या सुरक्षेत असल्याच्या वृत्त समोर येत आहे. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात बैठक आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडावे अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण हे महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही.
शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी कालच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यासाठी तुम्हीच फाटाफूट घडवून आणत आहात का? मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.