महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर ची घोषणा
कोल्हापूर – भारत सरकारची अग्निपथ योजना देशाच्या संरक्षणसिध्दतेसाठी महत्वाचे पाऊल असुन महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्रातर्फे आम्ही स्वागत करत असल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या राज्यातील व्यापार, उद्योग क्षेत्राच्या शतकमहोत्सवी संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
याबरोबरच या योजनेत आपला कार्यकाल पुर्ण करणार्या अग्निवीर युवकांना महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, सेवा क्षेत्रातील नवीन निर्माण होणार्या जागांमध्ये प्राथमिकता देण्याबरोबरच उच्च क्षेत्रातील जागांमध्ये 20 टक्के इतक्या जागा या युवकांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा ललित गांधी यांनी केली. चार वर्षाच्या कार्यकाळात अग्निवीर युवकांना राष्ट्रप्रेम, समर्पण, प्रामाणिकता, कठोर परिश्रम, नेतृत्वक्षमता, कठीण परिस्थितीचा सामना व निर्णय घेण्याची क्षमता या महत्वपुर्ण विषयांचे जे प्रशिक्षण व अनुभव मिळणार आहे ते कोणत्याही नेहमीच्या शिक्षणापेक्षा अधिक महत्वपुर्ण असणार आहे.
नेहमीच गुणवत्तेच्या शोधात असणार्या व्यापार, उद्योग क्षेत्रासाठी अग्निवीर युवक मिळणे ही मोठी फायद्याची गोष्ठ ठरणार आहे.
संरक्षण मंत्रालयाद्वारे घोषित ही योजना पुर्णपणे ऐच्छिक असल्याने त्याचबरोबर लष्कराची नियमित भरती प्रक्रिया सुरूच राहणार असल्याने या योजनेला विरोध करणे अकल्पनीय आहे. जगातील सर्वाधिक युवक असणार्या देशातील युवकांची उर्जा देश उभारणीसाठी उपयोगी होईल अशी ही योजना आहे.
देशातील युवकांनी प्रथम ही योजना नीटपणे समजुन घ्यावी व ज्यांना योग्य वाटेल त्यांनी यात अवश्य सहभागी व्हावे असे आवाहनही ललित गांधी यांनी केले आहे.