मुंबई – योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या महाराष्ट्रात “योगी’ कुणीच नाहीत. आहेत ते फक्त सत्तेचे “भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
यातच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना राज ठाकरेंवर टीका केली. राऊत म्हणाले,’‘ही सर्व भोंगेबाजी असून आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे.’
ते पुढे म्हणाले,’उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्यात आले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले आहे. याच प्रकारे पालन महाराष्ट्रातही करण्यात यावं, अशीच आमच्या सरकारची भूमिका आहे.’ असं म्हणत राऊत यांनी ठाकरेंच्या टीकेवर प्रतिउत्तर दिले.