मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत होते. अखेर संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राऊतांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे राऊत यांना दिलासा मिळाला असताना दुसरीकडे राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध कायम आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीची मागणी मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करायचं असल्यानं त्यांच्या जामीनाला ईडीने विरोध दर्शवत जामिनाच्या अंमलबजावणीला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता यावर सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने अशी स्थगिती द्यायला नकार देत ईडीची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांची आजच सुटका होणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे.
संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती.
राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे.