मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेला गोंधळ आणखी वेगळे वळण घेत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सत्ता स्थापनेचा राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे स्पष्ट असले तरी, दुसरीकडे भाजपा व शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आपले संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या चार दिवसांत शरद पावार यांनी शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्याच्या अफवांचे सातत्याने खंडन केले होते. बारामतीत बोलताना ‘जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही ती भूमिका पार पाडणार आहोत’, असे पवारांनी स्पष्ट केले होते.