नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वारंवार होणाऱ्या परदेशवाऱ्यांवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल कुठल्या गुप्त मोहिमेत सामील आहेत का, असा सवाल भाजपने पक्षाने केला आहे.
ध्यानधारणेसाठी राहुल इंडोनेशियात गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावरून भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत राहुल यांना लक्ष्य केले. राहुल लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या परदेशवाऱ्या जनतेच्या दृष्टीने दखलपात्र आहेत. मागील 5 वर्षांत ते 16 वेळा परदेशी गेले. तितक्या वेळा ते त्यांच्या अमेठी (उत्तरप्रदेश) या मागील लोकसभा मतदारसंघातही गेले नाहीत. त्यांना अमेठीतील जनतेने नाकारण्यामागचे तेही एक कारण आहे. राहुल 16 पैकी 9 वेळा कुठे गेले तेही समजू शकले नाही. त्याबाबतची माहिती उघड का करण्यात आली नाही, अशी विचारणा राव यांनी केली.
संपूर्ण जग ध्यानधारणेसाठी भारतात येते. मात्र, त्यासाठी राहुल परदेशी जातात. परदेशवाऱ्यांसाठी मोठा खर्च येत असतो. त्यामुळे राहुल यांचा तो खर्च कोण करतो, असा सवालही त्यांनी केला.