Sanjay Raut : मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ अखेर आज संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत.
मात्र निकाल नेमका किती वाजता लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे अंतिम निकाल साधारण दुपारी चार वाजता देणार असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर टांगती तलवार असल्याचं दिसून येत आहे. तर निकालाअगोदर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर भेट असून, त्यामुळे आता वातावरण चांगलाच तापलं आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा निकाल म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांसावर देखील निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग आहे. निकाल माहित असल्यामुळेच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौऱ्यावर आणि मुख्यमंत्र्यांचा डावोस दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्र्यांना निर्णय माहित आहे म्हणून ते दौऱ्यावर येत आहेत.
मॅच फिक्सिंग आधीचं झालयं म्हणून मुख्यमंत्र्यांचा ही डावोसचा दौरा आधीच फिक्स झाला विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटत नाही. परंतु तुम्ही का गेलेत आम्हाला माहित आहे. आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिल्लीतूनच आलेला आहे. आता फक्त शिक्का मारणं बाकी आहे. असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की शिंदे गटाने नेमलेला व्हीप बेकायदेशीर आहे. सुनील प्रभूंचा व्हीप कायदेशीर आहे. त्यांचा व्हीपच बेकायदेशीर असल्याने प्रत्येक निर्णयच बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी झालेली निवडच बेकायदेशीर आहे.
मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे सरकारमध्ये बसले आहेत. राज्यापालांची प्रत्येक कृती आणि कारवाई चुकीची आहे. त्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घडलेली घटना चुकीची आणि बेकायदेशीर आहे. हे सरकार बेकायदेशीरपणे राज्य करत आहे. असं देखील राऊत यावेळी म्हणाले.