मुंबई – खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी सरकार बनवायला दिले असून भाजपने महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 24 तासाचा वेळ दिला जातो. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करायला 30 तारखेपर्यंत वेळ दिला. बहुमत आहे तर एवढा वेळ कशासाठी घेत आहेत. फोडाफोड करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले, भाजपला व्यापारी समजत होतो पण त्यांचा व्यापार चुकला. भाजपने सचोटीने व्यापार करायला हवा होता. व्यापार प्रामाणिकपणे केला असता तर भाजपला अशी “दर-दर की ठोकरे’ खाण्याची वेळ आली नसती. भाजपने राष्ट्रपती भवन आणि राजभवनात काळाबाजार केला. या देशात खालच्या स्तरावर राजकारण केले जात आहे, याचे उदाहरण काल पाहायला मिळाले. बहुमत होते तर चोरुन शपथविधी का केला?, असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिले असल्याचे देखील ते म्हणाले. अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता मात्र तो डाव फसला आहे. अजित पवारांना घेऊन सत्ता बनविण्याच्या भ्रमातून भाजपने बाहेर यावे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
आम्ही घाबरणारे नाहीत. हा त्यांचा शेवटचा खेळ आहे. आता त्यांचा खेळ संपला. शरद पवार यांना महाराष्ट्र मानतो. अजित पवारांनी मोठी चूक केली. त्यांचा पक्ष फोडणे हे नैतिक नाही. असे करुन भाजपला काहीही फायदा होणार नाही. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स, पोलीस हे चार त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. हे चार खेळाडू आणि राष्ट्रपती आणि राजभवन तर राखीव खेळाडू आहेत.
या चौघाच्या जीवावर त्यांना जेवढा हैदोस घालायचा आहे तेवढा घालू द्या. या राज्याची जनता त्यांना भीक घालणार नाही. राज्यपाल आम्हाला एक न्याय देतात आणि भाजपला वेगळा न्याय देतात, असा आरोप देखील त्यांनी केला.
दरम्यान, कालचा दिवस हा काळा दिवस होता. यापुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या दिवसाला काळा दिवस म्हणण्याचा भाजपला अधिकार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.