Sanjay Raut – नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तब्बल 16 नवजात बालकांचा समावेश आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मंगळवारी घडला असून 2 बालकांसह 16 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे.
या गंभीर घटनेमुळे आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात इंटरेस्ट नसल्याचं दिसून येतंय. वेगळ्याच कामात ते अडकलेले असतात. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि सरकारला यांचं गांभीर्य काहीच वाटत नाही’, असं संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “नांदेडसारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण मृत्यू होतात. यावरती सरकार अस्तित्वातच नाहीये, असं दिसून येतंय. ही पहिलीच घटना नाहीये.
याआधी देखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयातदेखील असा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. यांच्यात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे’, असं देखील संजय राऊतांनी म्हटलं आहे.