हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथे मंगळवारी (दि. 3) सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे मागताच स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्याने घटनास्थळी जाऊन कर्मचाऱ्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले आहे. तर घेतलेले पैसे त्या कर्मचाऱ्यांनी अखेर शेतकऱ्यांना परत केले.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी पीक परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. पावसाने उघडीत दिल्यामुळे सोयाबीनचे शेंगा भरल्या नाही तर कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे पीक उत्पादनामध्ये किमान 40 ते 50 टक्के घट येण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा आगरीन द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही केले.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. या रोगामुळे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसला. सुरुवातील उशिरा पाऊस झाला, त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर सोयाबीन पिकावर गोगलगायीचे संकट आले. ही संकट संपत नाहीत तोच पुन्हा यलोमोझॅकने सोयाबीनवर हल्ला चढवला. या सर्व कारणांमुळे सोयाबीनच्या पीक वाढले शेंगाही आल्या परंतु त्या भरल्या नाहीत. उत्पन्नच होणार नसल्याने अनेकांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आली. या सततच्या रोगराईमुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे.
पिक विमा सर्वेक्षणासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यास चोप –
आज दुपारी तालुक्यातील माळहिवरा येथे पिक विमा कंपनीचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी आले होते. या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण व अर्ज भरून घेण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याचा सपाटा लावला होता. एका शेतकऱ्याकडून 200 ते 300 रुपये घेतले जाऊ लागले होते. या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
त्यानंतर स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी पदाधिकाऱ्यांसह माळहिवरा गाठून विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच चोप दिला. शेतकऱ्यांकडून पैसे कशासाठी घेत आहेत याची उत्तरेही या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देता आली नाही. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या नावासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करण्यात आले.