सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी इथल्या एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवणातील बासुंदीतून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाला. त्यांनतर मुलांना तातडीने माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
79 विद्यार्थी सध्या उपचार घेत आहेत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. उर्वरित 90 रुग्णांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये आणि जत मधील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. सध्या या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसंच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या आणि दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास 200 च्या आसपास मुले-मुली या आश्रमशाळेत आहे. यातील जवळपास 170 विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. सदर विद्यार्थ्यांना त्रास सुरू होताच तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यातील जवळपास विद्यार्थ्यांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणि जत मधील काही रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.
उमदीमधील समता आश्रम शाळेतील दीडशे ते दोनशे मुलांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. मुलांनी हे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या सुरू झाल्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. विषबाधा झालेल्या आश्रम शाळेतील मुलांचे वय पाच वर्षापासून ते पंधरा वर्षाच्या आतील आहे.