सहकार नगर – तळजाई टेकडीवर नैसर्गिक जैवविविधता टिकावी या हेतूने वनविभागातर्फे कोट्यवधींचा निधी खर्च करून करण्यात येत असलेल्या वृक्ष रोपणाच्या मुख्य हेतुलाच हरताळ फासला जात असल्याबाबत “प्रभात’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी वनविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे वनविभागाकडे झाडे ओळखणारी अभ्यासू कर्मचारीच नसल्याची बाब समोर आली आहे.
तळजाई टेकडीवर लावण्यात येणाऱ्या नवीन झाडांचा टेकडी परिसंस्थेत उपयोग नसून टेकडीवरील रानमारी झाडे काढून नवीन झाडे लावताना व्यवस्थापन योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. टेकडीवरील जैवविविधता जोपासण्यासाठी कोणती झाडे किती अंतरावर व कोणत्या पद्धतीने लावावीत याचे मार्गदर्शन करण्यासाठी वनविभागकडे यंत्रणाच नसल्याने अशा तांत्रिक चुका होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नव्याने वृक्षांचे रोपण करताना अशी यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे. अन्यथा “ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती निर्माण होऊन विदेशी निरूपयोगी झाडांचा काहीच उपयोग होणार नाही.
तळजाई बचाव अभियान…
तळजाई टेकवडीवर स्वदेशी वृक्ष लावण्याऐवजी विदेशी वनस्पती लावण्यात येत आहेत. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदर बाब मंचाच्या सदस्य केतकी साठे यांनी निर्दनास आणून दिली आहे. यामध्ये लक्षात आलेली महत्वाची गोष्ट म्हणजे वनविभागाकडे झाडं ओळखणारी व्यक्तीच नाही.
या बाबत झालेल्या चुका दुरुस्त करण्याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याबाबतची माहिती देणार आहे. तसेच याच प्रकारच्या चुका इतरत्र कुठे होत असतील तर त्यादेखील रोखण्याच्या दृष्टीने काय करता येईल का, याबाबत चर्चा करणार आहोत, वनविभागाचे काम करण्याची पद्धत पाहून पुन्हा एकदा तळजाई बचाव अभियान सहकारनगर नागरिक मंचाच्या वतीने राबविण्याचा विचार आहे, असे सहकारनगर नागरिक मंचचे अमित अभ्यंकर यांनी सांगितले.