नवी दिल्ली -अनेक शेतकरी संघटनांचा समावेश असणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आता अग्निपथ योजनेविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सैन्यदलांच्या भरतीशी संबंधित त्या योजनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा 24 जूनला देशव्यापी निदर्शने करणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत अग्निपथविरोधात रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, येत्या शुक्रवारी देशभरात जिल्हा आणि तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी निदर्शने केली जातील. त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोर्चाने युवक, नागरी संघटना आणि राजकीय पक्षांना केले आहे.
मोदी सरकारने अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर तीव्र पडसाद उमटले. त्या योजनेविरोधात देशाच्या विविध भागांत हिंसक निदर्शने झाली. आता संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरल्याने त्या योजनेला होणारा विरोध आणख तीव्र बनण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. त्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाने केले होते. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याने ते आंदोलन यशस्वी ठरले.