नगर – पर्यावरणाचे संवर्धन व वृक्षतोडीला आळा घालण्याच्या उद्देशाने महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड केल्यास आता 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत मनपा वृक्ष प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार सुधारीत वृक्ष कायद्याची नगर शहरात अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यापुढे बेकायदा वृक्षतोड केल्यास प्रति वृक्ष 50 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, 1975 या कायद्यात सुधारणा करून अंमलबजावणी करण्यात यावी, असे परिपत्रक काढून मनपाला आदेश दिले होते. तसेच या सुधारीत कायद्याची अंमलबजावणी मनपा कार्यक्षेत्रात करण्यात यावी व बेकायदा वृक्षतोड केल्यास संबंधितांवर प्रति वृक्ष दंड आकारावा, अशी मागणी करण्यात येत होती. या परिपत्रकात बेकायदा वृक्षतोड केल्यास जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादीत दंड राहिल असे म्हटले आहे.
या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात यापुढे बेकायदा वृक्षतोड झाल्यास 7 वर्ष वयाच्या पुढील प्रत्येक वृक्षासाठी 50 हजार रुपये दंड संबंधितांकडून आकारण्यात यावा तसेच या सुधारीत कायद्यानुसार 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे हेरिटेज वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत वृक्ष प्राधिकरण समितीने परवानगी दिल्यास त्याबदल्यात नुकसान भरपाई म्हणून तोडल्या जाणार्या वृक्षांच्या वयाच्या संख्येइतके वृक्षारोपण करून त्यांचे सात वर्षांपर्यंत संगोपन करणे बंधनकारक राहिल. स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने दर पाच वर्षाने किमान एकदा वृक्ष गणना करावी. नवीन प्रकल्पांचे आरेखन करताना कमीत कमी वृक्ष तोडावेत. पर्यायी प्रकल्पांचाही विचार करावा.
वृक्ष कर वृक्षारोपण व संगोपनासाठी खर्च करावा, या काही मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक महेंद्र गंधे, हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, तुलसीराम पालीवाल, शहर अभियंता सुरेश इथापे उपस्थित होते.