पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या सत्राचे निकाल लागल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रतीसाठी अर्ज केला होता. परंतु दोन ते अडीच महिने उलटून गेल्या नंतर सुद्धा अद्यापही विद्यार्थ्यांना छायांकीत प्रती प्राप्त झालेल्या नाही.
काही विद्यार्थ्यांना छायांकित प्रती मिळाल्या परंतु त्यांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. पुढच्या सत्र परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपून देखील मागच्या सत्र परीक्षांचे पुनर्मूल्यांकन निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अभविपने आक्रमक भूमिका घेत परीक्षा विभागातच आंदोलन केले.
अभविपने वारंवार आपल्या विभागाशी संपर्क केला, चर्चा केली निवेदने दिली परंतु हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे अभाविपने परीक्षा विभागाच्या विरोधात काही मागण्यांसाठी आंदोलन केले.
ज्या विद्यार्थ्यांनी छायांकित प्रतींसाठी अर्ज केलेला आहे त्यांना तात्काळ छायांकित प्रती देण्यात याव्या व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी आणि ज्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही तो तात्काळ जाहीर करण्यात यावा. जे विद्यार्थी या पुनर्मूल्यांकन निकालात उत्तीर्ण होतील त्यांना पुढील परीक्षा शुल्कातून उत्तीर्ण झालेल्या विषयांचे शुल्क परत देण्यात यावे, आदी मागण्या अभाविपने विद्यापीठाकडे केल्या आहेत.
ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मानले जाणारे हे पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावून सुद्धा गुण पडताळणी आणि फोटोकॉपीला धरून विद्यार्थ्यांना खेळवत अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असे अभाविपचे महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काम केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेच आहे ते नुकसान कशा पद्धतीने वाढेल यासाठी परीक्षा विभाग सतत कार्यरत आहे या गोष्टींना थांबल्यास अभाविप परीक्षा विभागाच्या विरोधामध्ये मोठ आंदोलन उभे करेल, असे मत अभाविप पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी व्यक्त केले.