मुंबई :- “समृद्धी’ महामार्गावरील अपघातांच्या सत्रावर “हा शेतकऱ्यांचा शाप आहे’, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने समृद्धी महामार्गसाठी घेतल्या त्या शेतकऱ्यांचा शाप लागला असल्याचे म्हणत राऊतांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर “राजकारणी हा विषय कधी गांभीर्याने घेणार आहेत?’ असा सवाल विचारत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
शहापूर ठाणे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून 17 मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शाहपूर सरलांबे येथे गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यावर आता विरोधकांकडून पुन्हा एकदा सरकावर निशाणा साधण्यात येत आहे.
यावर चर्चा होणे गरजेचे – सुळे
दरम्यान, अशा घटनांची जबाबदारी कोणतेही सरकार घेणार नाही असा दावा देखील सुळेंनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, सरकार मृतांच्या नातेवाईकांना मदत करते पण मदत करुन गेलेला माणूस परत येत नाही. तर यावर संसदेत आणि विधानभवनात सविस्तर चर्चा व्हायलाच हवी. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एवढी अद्यायावत यंत्रणा असताना हा अपघात झालाच कसा असा सवालही सुळे यांनी यावेळी केला