मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आज (मंगळवार) निकाल आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. आणि याच निवडणुकांचे आज निकाल जाहीर होत आहेत.
अश्यातच, संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेतून राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहण्याची तयारी सुरू केलीये. या स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचं दिसून येत आहे. स्वराज्य संघटनेचे धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत.
तर, नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार स्वराज्य संघटनेच्या 3 ग्रामपंचायत विजयी झाल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशगाव व वासोल गाव आणि धाराशिव जिल्ह्यातील तडवला ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड सुरू असून, कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.