समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने उत्तरप्रदेशच्या राजकारणातील दिग्गज नेता आणि समाजवादी विचारधारेचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे. बिगर भाजप, बिगर कॉंग्रेसी शैलीच्या राजकारणात त्यांनी आपले वजन आणि महत्त्व शेवटपर्यंत कायम ठेवले होते.
राममनोहर लोहिया, राजनारायण यांचे सच्चे अनुयायी असलेले मुलायमसिंह यादव यांनी आपल्या राजकीय आयुष्यात शेवटपर्यंत समाजवादी विचारधारेवरच राजकारण करणे पसंत केले होते. त्यामुळे त्यांनी भाजपशी कधीच आघाडी किंवा युती केली नाही. कॉंग्रेसी विचारांच्याही विरोधात ते प्रामुख्याने राहिले. पुढे भाजप प्रबळ होत गेल्याने केवळ तडजोड म्हणून त्यांनी कॉंग्रेसशी काही वेळा हातमिळवणी केली असली, तरी त्या आघाडीत ते फारसे रमले नाहीत. उत्तरप्रदेशाच्या राजकारणात स्वत:च्या ताकदीवर पक्ष काढणे, तो सत्तेवर आणणे आणि कोणत्याही लाटेत आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवणारे ते एक प्रभावी राजकारणी होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचेही ते अनुयायी होते. पण त्यांच्याहीपासून वेगळे होत त्यांनी समाजवादी पक्ष हा स्वत:चा पक्ष काढला आणि त्याची जनमानसावरील मोहिनी बराच काळ टिकवून ठेवली.
सात वेळा खासदार, दहा वेळा आमदार, तीन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद आणि दोनदा केंद्रात संरक्षण मंत्रिपद अशी त्यांची समृद्ध राजकीय कारकीर्द आहे. समाजवादी शैलीतले नेतृत्व हे तसे मवाळ प्रवृत्तीचे नेतृत्व मानले जाते. पण मुलामयसिंह यांची विचारधारा समाजवादी स्वरूपाची असली तरी त्यांचे मात्र नेतृत्व मवाळ स्वरूपाचे नव्हते. ते अत्यंत करारी आणि दरारा असलेले नेते मानले जायचे. त्यामुळेच उत्तरप्रदेशाच्या राजकारणात गेल्या काही दशकांत झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीत अनेक पक्षांतील अनेक लोकप्रतिनिधी इकडून तिकडे गेले तरी समाजवादी पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र फारसे कधी फुटलेले दिसले नाहीत. राजकीय शक्ती परीक्षेच्यावेळी आपल्या पक्षाचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी त्यांना रिसॉर्टमध्ये मुक्कामाला घेऊन जाण्याची वेळ मुलायमसिंह यांच्यावर कधी येत नसे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अयोध्या आंदोलन हे एक मोठे पर्व मानले जाते. अयोध्येत कार सेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश त्यांच्या सरकारच्या काळात दिला गेला होता. त्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उत्तप्रदेशात सत्ता मिळवली; पण त्यांना मुलायमसिंह यांना पूर्णपणे संपवणे शक्य झाले नाही.
मधल्या काळात त्यांच्यापुढे बहुजन समाज पक्षाचेही आव्हान निर्माण झाले होते. पण त्या पक्षाच्या लाटेतही मुलायमसिंह यांच्या पक्षाचे अस्तित्व पुसले गेले नाही. स्वतःच्या शैलीने स्वतंत्र बाण्याने राजकारण करणारा हा नेता होता. त्यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी आली होती. पण त्यांच्या हातून ती थोडक्यात निसटली. लालूप्रसाद यादव, शरद यादव वगैरे मंडळींनी त्यांची ही संधी हिरावून घेतली असे म्हणतात. त्यामुळे त्यांना मिळू शकणारे पंतप्रधानपद देवेगौडा यांना मिळाले, नंतरच्या काळात इंद्रकुमार गुजराल यांना ती संधी मिळाली. बिगर कॉंग्रेस, बिगर भाजप पक्षाच्या आघाडीचे एकमुखी नेतृत्व करण्याची संधी त्यांना लाभली होती. पण त्यांनी कधी परिघाबाहेर जाऊन त्यासाठी उठाठेवी केल्या नाहीत. समाजवादी विचारधारा ही आजच्या जमान्यात तशी संपत चाललेली विचारधारा मानली जाते.
नव्या जागतिकीकरणाच्या जमान्यात कम्युनिस्टांची विचारधारा जशी संपत गेली तशीच अवस्था समाजवादी विचारधारेचीही झाली. आज ही एक जुनी राजकीय विचारधारा बनली असल्याचा समज निर्माण झाला आहे, असे असतानाही जातीयवादाचा मोठा प्रभाव असलेल्या उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यात त्यांनी याच विचारधारेवर आपला पक्ष टिकवून ठेवला होता, याची नोंद घ्यावीच लागेल. मुलायमसिंह यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी राज्य करताना आपल्या विचारधारेच्या बाहेर जाऊन आपल्या सरकारच्या धोरणात काही कालानुरूप बदलही स्वीकारले. विशेषत: अमरसिंह यांच्या संगतीने त्यांनी उत्तरप्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी भांडवलशाहीची मदत घेतली होती. अनेक उद्योगपती घराण्यांशी त्यांनी जवळीक साधली होती व त्यांना उत्तरप्रदेशात गुंतवणुकीला मोठे प्रोत्साहन दिले होते.
वास्तविक ही बाब समाजवादी विचारधारेत बसणारी नाही, पण त्यांनी काळाची गरज ओळखून ते पाऊलही उचलले. सहारा उद्योग समूहाचे सुब्रतो रॉय हे त्यांचे निकटवर्तीय होते. अमरसिंह यांच्या सांगण्यानुसार मुलामसिंह यांनी बॉलिवूडच्या नटनट्यांनाही आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. त्यातूनच अमिताभ बच्चन हे त्यांच्या सरकारच्या काळात उत्तरप्रदेशचे ब्रॅंड ऍम्बॅसिडर बनले होते. त्यांच्या पत्नी जया बच्चन राज्यसभेच्या सदस्या बनल्या आणि जयाप्रदा या लोकसभेतील त्यांच्या उमेदवार ठरल्या होत्या. मुंबईच्या चित्रपटसृष्टीला उत्तरप्रदेशात चित्रीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांच्या सरकारने मोठा आटापिटा केला होता. या घटनाही लोकांच्या लक्षात राहिल्या आहेत. या अत्यंत प्रभावी नेत्याला त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मात्र परिवारातील वादाने मोठ्या प्रमाणात खच्ची केले होते. त्यांच्या मुलानेच वडिलांच्या विरोधात बंड करून समाजवादी पक्षावर ताबा मिळवला होता व त्या वेळी मुलायमसिंह स्वतःच्या पक्षातच एकटे पडल्याचे विदारक चित्र दिसून आले.
आपला पक्षच खरा समाजवादी पक्ष आहे हे निवडणूक आयोगापुढे जाऊन सिद्ध करण्याची वेळही त्यांच्यावर आली होती. त्यांच्या बाबतीत त्यांचे राजकीय विरोधक त्यांचे जे नुकसान करू शकले नाहीत, ते नुकसान त्यांच्या घरातल्या लोकांनीच केले आणि त्यांच्यापुढे हतबल होण्याची वेळ मुलायमसिंह यांच्यावर आली. आपल्या पक्षावर आता आपले चिरंजीव अखिलेश यांचे पूर्ण नियंत्रण आले आहे, हे लक्षात आल्यानंतर या ज्येष्ठ नेत्याने ते फार मनाला लावून न घेता पक्षातील नव्या पिढीची सत्ताही त्यांनी निमूटपणे मान्य केली आणि त्या चौकटीत राहून राजकारण करू लागले.
अलीकडच्या काळात त्यांचे वयही चांगलेच दिसू लागले होते. लोकसभेत बोलताना काही वेळा त्यांच्या संदर्भहीन भाषणांचे हसेही झाले. ज्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू असायची तो विषय सोडून ते भलतेच मुद्दे मांडताना दिसून येत. मग सभापतींनाही सध्या कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे याची त्यांना आठवण करून द्यावी लागायची. पण लोकसभा अधिवेशनातील अट्टहासाने उपस्थिती हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. गरिबांविषयी कणव असलेला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि धार्मिक उन्माद पसरवू पाहणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा एक खंबीर नेता अशी त्यांची प्रतिमा शेवटपर्यंत टिकून होती.