जीवनावश्यक वस्तुंची चढ्या दराने विक्री
यवत -देशभर करोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्वत्र सर्वच व्यवहार ठप्प आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक किराणा मालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. मात्र दुकानदार मालाचा तुटवडा असल्याचे भासवून किराणा मालाची चढ्या दराने विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी ग्राहक करीत आहेत. चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना लगाम घालण्यासाठी दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर मालाच्या किंमतीचा फलक लावण्याची मागणी ग्राहकवर्गातून होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात करोनाला रोखण्यासाठी सरकार विशेष काळजी घेत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, त्याबरोबरच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारने चोवीस तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक किराणा मालाच्या दुकानाच्या बाहेर गर्दी करताना दिसत आहेत. दुकानदार मालाचा तुटवडा असल्याचे भासवून चढ्या दराने विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमुळे नागरिक अगोदरच हैराण झाले आहेत. किराणा मालाचे दुकानदार ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहेत. ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी सरकारने दुकानदारांना दुकानाबाहेर मालाच्या किंमतीचा फलक लावण्याची व माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना छापील बिल देण्याची सक्ती करावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे, असे झाल्यास ग्राहक वर्गांची होणारी आर्थिक लूट थांबण्यास मदत होईल. ग्राहक वर्गांनेही दुकानदारांकडून खरेदी केलेल्या मालाचा छापील बिल देण्याचा आग्रह धरावा जेणेकरून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा बसण्यास मदत होईल.
किराणा मालाच्या दुकानाच्या ठिकाणी नागरिक एकत्रित गर्दी करून उभे राहत आहेत. काही दिवसांपुर्वी बॉक्स केले होते पण ते पावसामुळे नष्ट झाले आहेत, ते दुकानदारांनी पुन्हा केले पाहिजेत. किराणा दुकानदारांनी नागरिकांना किराणा घरपोच देण्यासाठी प्रयत्न करावेत. काही ठिकाणी वाढीव दर घेतले जात असतील तर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून या परिस्थितीत दुकानदारांनी नागरिकांना सहकार्य केले पाहिजे, काही दुकानदारांची अशी तक्रार आहे कि शेंगदाणे, डाळी, तेल, बिस्कीट या वस्तुंचा पुरवठा होत नाही तरी प्रशासनाने या गोष्टी उपलब्ध करुन द्याव्यात.
-राहुल अवचट,
पुणे जिल्हा अध्यक्ष-माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ. दौंड शहरातील किराणा मालाच्या होलसेल डीलरवाल्यांची बैठक घेतली असून मालाच्या किंमती न वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. किराणा मालाचा दुकानदार चढ्या दराने ग्राहकाला माल विकत असल्याबाबत तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधित दुकानदारावर जीवनावश्यक वस्तू 1955 च्या अधिनियम कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
-संजय पाटील, तहसीलदार, दौंड.