अरुण गोखले
शिवोपासना ही आपल्या संस्कृतीत आदिअनादि कालापासून चालत आलेली आहे. शिवोपासनेचे जे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात शिवास बेलाचे पान अर्पण करणे ही सर्वात महत्त्वाची अशी पूजा मानली गेलेली आहे. बिल्बपूजेचे महत्त्व आणि त्याचे फलित सांगणारा जो श्लोक आहे तो असा आहे की-
त्रिदलं त्रिगुणाकारं
त्रिनेत्रं च त्रयायुधम्।
त्रिजन्म पापसंहारम
बिल्बपत्रं शिवार्पणम्।।
शैव सांप्रदायाची उपास्य देवताही भगवान शिव शंकर ही असून त्या उपास्य देवतेच्या पूजनातील महत्त्वाची एक वस्तू म्हणजेच बेलाचे पान अर्थात बिल्बपत्र. बिल्बपत्र ही त्या सांप्रदायाची सांस्कृतिक खूण आहे. ज्याप्रमाणे वैष्णवांच्या विष्णू पूजनात तुलसी पूजनास जसे विशेष महत्त्व आहे. तुळस जशी विष्णूस अति प्रिय आहे त्याप्रमाणेच शिवास हे बेलाचे पान अत्यंत प्रिय आहे.
बेल हे त्याचे मराठी नाव, त्यालाच संस्कृत भाषेत बिल्ब म्हणून संबोधले जाते. बेलाच्या झाडाची पाने ही त्रिदलात मोडतात. त्यांची नैसर्गिक रचना ही फार वेगळीच असते. बेलाच्या एका पानाला तीन दले असतात. त्याचे मधले पान हे लंबगोलाकृती असून ते टोकाकडे निमुळते होत गेलेले असते. त्याच्या खालची डावी आणि उजवी कडची पाने सुद्धा तशाच आकाराची पण उभ्या पानापेक्षा थोडी लहान असतात. तीन दलाचे हे एक पान म्हणून त्याला त्रिदलपत्र असे म्हणतात.
बेलाच्या पानाची ही तीन दले म्हणजे सत्त्व रज आणि तमो या प्रत्येक जीवाच्या ठायी असणाऱ्या गुणाचे प्रतीक आहे. हे तिन्ही गुण प्रत्येक स्त्री पुरुषाच्या ठायी कमी जास्त प्रमाणात असतातच. हे त्रिगुण धरून ठेवत असतो तो म्हणजे माणसाच्या मनातील अहंकाराचा दांडा.
या संदर्भात थोर शिव उपासक, सद्गुरू, हे आपल्याला हेच शिकवीत असतात की बेलाचे पान शिवास अर्पण करताना प्रथम तुम्ही तुमच्या विवेक, विचाराने त्याचा अहंकाराचा दांडा तोडा. मग ते त्रिगुणात्मक बेलाचे पान समर्पणभावाने शिवाचे चरणी अर्पण करा. त्यास प्रार्थना करा की “हे सदाशिवा! तू माझ्या मनातील अहंकार रहित ह्या तिन्ही गुणांचा म्हणजेच मी जसा आहे तसा या बिल्बपत्राच्या रूपाने माझा स्वीकार कर आणि माझे जीवपण हे तुझ्या शिवरुपाशी एकरूप होऊ दे’. असे बिल्बपत्र शिवास अर्पण करणे हीच खरी बिल्बपूजा आहे.