ओतूर -सर्वत्र करोना विषयी भयमय परिस्थिती निर्माण झालेली असताना करोनाने आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. शहरी भागातून आलेल्या नागरिकांसोबत करोना काही अंशी ग्रामीण भागात आला आहे. हे आता स्पष्ट झालेले आहे.नुकताच मुंबईहून आलेला एक व्यक्ति करोना बाधित निघाला आणि याच बातमीने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामुळे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील जनतेला घाबरुन न जाता संसर्ग टाळण्यासाठी घरातच बसण्याचा सल्ला दिला आहे.
शासकीय यंत्रणा सदैव आपल्या सेवेत तत्पर असल्याचे सांगत आमदार बेनके म्हणाले, डिंगोरे येथील करोना पॉझिटिव्ह टेस्ट आलेला व्यक्तीचे मुंबई येथील विमानतळावर काम चालत होते. ओतूरला देखील हा रुग्ण फिरलाय. अनेकांच्या संपर्कात आल्याने जनतेने सतर्क राहण्याची गरज भासत आहे. याकरिता काळजी घेण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. अद्यापही जनतेकडून गांभिर्य घेतले जात नसल्याबाबत प्रशासनाला खंत वाटत आहे.
वाढता प्रादुर्भाव पाहता जनतेने आपली काळजी घेण्याची नितांत गरज आहे. नित्य कामांना आपल्या जिवासाठी काही दिवस का होईना फाटा द्यायला हवा. सध्या जर कोणी प्रशासनाच्या सूचना डावलून बिनकामाचे बाहेर फिरकत असेल तर अशांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. आता त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.