शिर्डी – गेल्या अडीच वर्षांपासून साईसमाधी मंदिरात भाविकांना फुले व पूजा प्रसाद साहित्य नेण्यास संस्थान प्रशासनाने बंदी घातली होती.परंतु भाविकांना समाधीवर फुले वाहण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी झाल्याने याबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आली. या समितीने यावर सकारात्मक निर्णय दिल्याने आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साई मंदिर परिसरात फूल विक्री करण्यास परवानगी असल्याचे जाहिर केले.
मंत्री विखे पाटील यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी यावर अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला. त्यावर निर्णय घेताना शिर्डी व परिसरातील ज्या शेतकऱ्यांची फुलशेती आहे. त्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद आहे, अशाच शेतकऱ्यांना अधिकृतपणे नवीन दर्शनरांगेमध्ये छोटे छोटे स्टॉल उपलब्ध करून देऊन त्याठिकाणी फुलविक्री करता येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा मंत्री विखे पाटील यांनी शिर्डीत केली.
या निर्णयामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून देशातील अनेक भाविकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. फुलशेती करणारा शेतकरी आता आपली फुले थेट विक्री करू शकतो. त्यामुळे एजंटच्या माध्यमातून होणारी लूट व फसवणूक यावर कायमचाच चाप बसणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या कष्ठाचे पैसे दररोज मिळतील, त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबाला होऊन आर्थिक फायदाही होणार आहे. साईसमाधीवर भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांपासून सुगंधी अगरबत्ती निर्माण करून महिला बचत गटातील शेकडो महिलांना रोजगार मिळणार असून भाविकही अगरबत्ती मोठ्या श्रद्धेने खरेदी करून घरी नेतील एकूणच फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याबरोबर महिलांनाही रोजगार मिळणार असल्याने शिर्डीच्या अर्थकारणावर याचा मोठा फायदेशीर परिणाम होणार आहे.
कोट्यवधी खर्च करून साई संस्थानने अत्याधुनिक दर्शनरांगेची निर्मिती केली असून या दर्शनरांगेच लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. याच मुहूर्तावर शेतकरी आपली फुले दर्शनरांगेत विक्री करायला सुरुवात करतील.
राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री