Brij Bhushan Singh – भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांनी आपल्याला धमकी दिली असल्याचा आरोप भारताची ऑलिंपिक मेडलीस्ट महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) हीने केला आहे. आपल्याला धोका असल्याचे नमूद करतानाच आगामी निवडणुका लढण्याच्या संदर्भातही तिने माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना साक्षी म्हणाली, २१ डिसेंबर रोजीच मी कुस्तीला रामराम केला आहे. सरकारने नवा कुस्ती महासंघ निलंबित केला आहे त्याचे मी स्वागत करते. या निवडणुका झाल्यावर ब्रिजभूषण यांनी जो प्रकार केला तो सगळ्यांनी पाहिला आहे. ब्रिजभूषण शक्तीशाली आहेत हे माहिती होते मात्र एवढे शक्तीशाली आहेत ते पहिल्यांदाच समजले.
कुस्ती महासंघाची आपल्याला काही अडचण नव्हती, तर संजय सिंह यांची अडचण होती. आता जी सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे त्याच्याशीही आपण सहमत असल्याचे तिने म्हटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन केले की ब्रिजभूषण यांचा कुस्ती महासंघात कोणता हस्तक्षेप राहणार नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे.
आपण वयाने लहान असलेल्या खेळाडूंचा हक्क हिरावत नसल्याचे नमूद करतान ती म्हणाली की ब्रिजभूषण आमच्यावर आरोप करतो आहे की आम्ही ज्यूनिअर खेळाडूंचे अधिकार हिरावून घेत आहोत. मी आता संन्यास घेतला आहे. आता येणाऱ्या नव्या मुलींनी माझे स्वप्न पूर्ण करावे अशीच माझी इच्छा आहे. ६२ किलो वजनी गटात मी कांस्य पदक जिंकले होते. या मुलींनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये रजत अथवा सुवर्ण पदक जिंकावे अशी माझी इच्छा आहे.
धमकीचे फोन येत आहेत…
साक्षी म्हणाली की तिच्या कुटुंबातील सदस्यांना धमकीचे फोन येत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ब्रिजभूषणची माणसे सक्रिय झाली आहेत. त्याच्याच कोणा माणसाने माझ्या आईलाही फोनवरून धमकावले. लवकरच माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीवर पोलीस केस होणार असल्याचे तो धमकावत होता. आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवर आहे. ब्रिजभूषण आमच्या संघर्षाला कोणतातरी रंग देण्याचा प्रयत्न करतो आहे. याला उत्तर प्रदेश विरूध्द हरियाणा किंवा जातीचा रंग देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. माझी एवढीच इच्छा आहे की आम्ही सुरक्षित असावे.
निवडणूक लढणार का?
येणाऱ्या काळात कुस्ती महासंघाची निवडणूक लढणार का असे विचारल्यावर साक्षी म्हणाली सध्यातरी ती कमालीची अस्वस्थ आहे. आता जी नवीन मुले आणि मुली कुस्तीत येत आहेत त्यांचे नुकसान होऊ नये याकडेच माझे लक्ष आहे. पुढे मी काय करणार याबाबत आताच काही सांगू शकत नाही. गेल्या वर्षभरापासून शारिरिक आणि मानसिक दृष्टीने मी अस्वस्थ आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की महासंघात जर महिलांचा सहभाग असला तर ते अधिक चांगले असेल.