पुणे – रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते, त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन दैनिक प्रभातने दि.६ एप्रिलला रक्तदान शिबिराचा संकल्प केला आहे. हे शिबिर दैनिक प्रभातच्या नारायण पेठ, येथील कार्यालयात होणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दै. प्रभात तर्फे करण्यात आले आहे. (Blood donation is the best donation..! Organize blood donation camp on Saturday at Dainik Prabhat office)
आपल्या शरीरात असलेल्या साडेचार ते पाच लिटर रक्तापैकी केवळ ३५० ते ४५० एम.एल. रक्तच काढून घेतले जाते. रक्तदान केल्यानंतर लिक्विड घेताच रक्तवाढीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे वयवर्षे १८ ते ६५ यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केले पाहिजे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते. परंतु, रक्तदान करणाऱ्यांची संख्या सध्या कमी आहे.
मोठ्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रियांमध्ये रक्ताची अत्यंतिक गरज असते, अशावेळी रक्त हे संजीवनीच ठरते. परंतु, अनेक गैरसमजुतीमुळे तरुण रक्तदानासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकी तीन महिन्यांनी पुरुष आणि चार महिन्यांनी स्त्रिया रकदान करू शकतात. रक्तदान केल्यानंतर पुढील तपासणी प्रक्रिया करूनच ते रक्त अन्य रुग्णांना दिले जाते. यामध्ये एड्स, कावीळ बी आणि सी, मलेरिया, गुप्तरोग अशा चाचण्या करून या रक्तातून वेगवेगळे घटक बाजूला केले जातात.
ज्या रक्तामध्ये आजाराचे विषाणू सापडतात ते रक्त वापरले जात नाही. रक्तामधून काढलेल्या लाल पेशी ४२ दिवस राहतात. प्लाझ्मा एक वर्षे तर प्लेटलेट पाच दिवस जिवंत राहतात. शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. तो भरून काढणे अत्यंतिक आवश्यक असते, अन्यथा शस्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात्. एखादी तातडीची शस्रक्रिया असेल तर त्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळेच आता उन्हाळ्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन दै. प्रभातने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
अधिक माहिती –
रक्तदान शिबिराचा दिवस : दि. ६ एप्रिल २०२४
स्थळ : दैनिक प्रभात, ३०३, नारायण पेठ, लक्ष्मी रस्त्याजवळ, पुणे-३०
वेळ : सकाळी ९.०० ते ५.००
संपर्क क्र. ९९२२-४०-४९०८