राजेंद्र भुजबळ
शिर्डी – आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून खाती असलेल्या शिर्डीत साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेवून शिर्डीकरांच्या मागणीचा आदर केला आहे. सन 2008 पूर्वी साईबाबांच्या आरतीच्या ज्या वेळा होत्या. त्यानुसार आता आरती करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला असून येत्या महाशिवरात्रीला 1 मार्चपासून पहाटेची आरती 5.15 मिनिटे तर रात्रीची शेजारती रात्री 10 वाजता होणार आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विश्वस्तांचे आभार मानले आहेत.
आजपर्यंत शिर्डीचे साईबाबा हे कोणत्या जाती धर्माचे होते?हे एक रहस्य आहे. त्यामुळेच शिर्डीत अनेक देश विदेशातील वेगवेगळ्या जाती धर्माचे करोडो भाविक बाबांच्या चरणी नतमस्तक होताना दिसतात. मंदिराचे वैशिष्ट् म्हणजे दररोज धार्मिक विधी करताना दिवसभरात चार आरत्या मोठ्या भक्तिभावाने म्हटल्या जातात. साईबाबांच्या हयातीत मार्च 1911 मध्ये बाबांचे निस्सीम भक्त मेघा गुजराथी यांनी द्वाराकमाई अर्थात मस्जिदमध्ये पहिली आरती केल्याची नोंद आहे. परंतु 15 ऑक्टोबर 1918 साली साईबाबांचे महानिर्वाण झाले. त्याच रात्री बाबांचे भक्त लक्ष्मण रत्नपारखी यांना स्वप्नात बाबांनी आदेश दिला व त्यांनी 16 ऑक्टोबरपासून मस्जिदमध्ये जाऊन बाबांची पहिली काकड आरती, शेजारती केली आणि या चारही आरती मोठ्या भक्ती भावाने सुरू झाल्या.
आरतीची ही परंपरा ही आजतागायत सुरू आहे. मात्र साई संस्थांनचे तत्कालिन अध्यक्ष स्व. जयंत ससाणे यांनी भाविकांची होणारी गर्दी व प्रत्येकाला दर्शन मिळावे, या प्रामाणिक हेतूने 6 एप्रिल 2008 रोजी दोन आरतीच्या वेळेत बदल केला होता. तो म्हणजेच परंपरेनुसार पहाटेची आरती ही सकाळी 5.15 मि. व रात्रीची शेजारती ही रात्री 10 वाजता होत असे, मात्र त्यात बदल करून काकड आरती पहाटे 4.30 वाजता व शेजारती 10.30 वाजता निर्णय घेण्यात आला. मात्र त्याला ग्रामस्थांनी विरोधही केला होता. कारण हा परंपरेचा धार्मिक विषय होता. तरी सुद्धा विरोधाला जुगारून हा निर्णय पारीत केला गेला होता.
आता नवीन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्याकडे शिर्डी ग्रामस्थांनी पूर्वीच्या वेळेप्रमाणे काकड, आरती, मंगलस्नान व शेजारती असावी असे निवेदन दिले व त्याचा पाठपुरावा केला. अखेर ग्रामस्थांच्या मागणीचा आदर ठेवत 21 फेब्रुवारी रोजी साई संस्थानच्या विशेष बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून त्याची अंमलबजावणी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तापासून अर्थात 1 मार्च पासून होणार आहे.
अनेक दिवसांपासून ग्रामस्त व भाविकांची काकड आरती व शेजारतीची वेळ पूर्वीप्रमाणे असावी,अशी मागणी होती, त्यावर अभ्यास करून व परंपरेचा विचार करूनच हा प्रशासनाने निर्णय घेतला असून महाशिवरात्रीच्या 1 मार्च या दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
भाग्यश्री बानायत, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थान
ग्रामस्थांच्या भावना व मागणीचा विचार करून हा ऐतिहासिक निर्णय घेण्याच भाग्य ही साईबाबांची सेवा आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हा निर्णय घेऊ शकलो.
– डॉ.एकनाथ गोंदकर विश्वस्त, साई संस्थान
भाविकांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रत्येक भाविकाला आता सुरळीत व शांतदर्शन व आरतीचा आनंद घेता येईल व वेळही वाचेल.
– अभयराजे शेळके नगरसेवक शिर्डी.
वेळेची होणारी बचत व भाविकांना मिळणारे दर्शन यामुळे शिर्डीतील व्यवसाय नक्कीच वाढतील, त्यामुळे ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.
– ऍड. अनिल शेजवळ,शिर्डी