पुणे- राज्यातील 197 पैकी 90 साखर कारखान्यांनीच 100 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक “एफआरपी’ म्हणजे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत दिली आहे. तर, 53 कारखाने 100 टक्के फरक देण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अजूनही 49 कारखान्यांनी 80 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिल्याचे साखर आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.
राज्यात यंदा 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू झाला. त्यानंतर 197 साखर कारखान्यांत गाळप सुरू झाले. यात 98 सहकारी आणि 99 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी 21 फेब्रुवारीपर्यंत 892.87 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 913.53 लाख क्विंटल साखर उत्पादित केली. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.23 टक्के आहे. चालू गाळप हंगामात विक्रमी उसाचे गाळप झाले असले, तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने साखर कारखाने आणि आयुक्तालयाने ऊस गाळपाचे नियोजन तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.