लखनौ – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याचे भाकीत केले आहे. तसे झाल्यास सरकार स्थापनेसाठी भाजपविरोधी गोटात जाण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
विविध राज्यांच्या निवडणूक रणांगणात आप उतरला आहे. पंजाबमधील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सोमवारी उत्तर प्रदेशात प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, एका व्यक्तीने माझ्याकडे येऊन भावना व्यक्त केल्या. तुम्ही मोठ-मोठी आश्वासने देत आहात. पण, तुमचा पक्ष जिंकेल का, अशी विचारणा त्या व्यक्तीने केली. उत्तर प्रदेशात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असे अंदाज सर्वच चाचण्यांतून व्यक्त होत असल्याचे उत्तर मी दिले. तशा स्थितीत सरकार स्थापण्यासाठी आम्ही भाजपविरोधी गोटात जाऊ. त्या सरकारकडून आम्ही आश्वासनांची पूर्तता करून घेऊ असे त्या व्यक्तीला मी सांगितले, असे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेश निवडणूक आप स्वबळावर लढवत आहे. मात्र, निवडणुकीनंतर गरज भासल्यास भाजपेतर पक्षांबरोबर जाण्याची आपची तयारी असल्याचे संकेत केजरीवाल यांनी त्यांच्या वक्तव्यातून दिले. अर्थात, उत्तर प्रदेशात काय घडणार आणि आपल्याला किती जागा मिळणार ते निकालातूनच समोर येईल.