मठातून विवादास्पद विषयावर राजकीय संदेश दिल्याने नाराजी
नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलूर येथील रामकृष्ण मिशन मठाला भेट देऊन अभिवादन केले होते. यावेळी मोदी यांनी भाषणही केले होते. मठात झालेल्या भाषणात मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या त्या भाषणावर मठातील साधूंमध्ये नाराजी पसरल्याचे सांगण्यात येत आहे. रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादस्पद विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचे बघून खूप वाईट वाटले, अशा शब्दात साधूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर होते. यावेळी मोदींनी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्तानं मोदींनी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेल्या बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या मठाला भेट दिली होती. यावेळी मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. यात त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भूमिका मांडली. तसेच विरोधकांवरही टीका केली.मोदींच्या भाषणावर मठात नाराजी व्यक्त होत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. स्वर्गीय स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी संदर्भात भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादास्पद असलेल्या विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचे पाहून खूप दुःख वाटले, असे ते म्हणाले.
मला दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. एक म्हणजे रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत प्रक्रिया आहे आणि मोदींनी दीक्षा घेतलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय अंगाने बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. अशाच मुद्यावरून रामकृष्ण मिशनला मागील वर्षी राजकीय वादात ओढण्यात आले होते. मिशन ही अराजकीय संस्था आहे, असेही ते म्हणाले.
मोदींच्या भाषणाविषयी बोलताना मठाचे सचिव स्वामी सुविरनंदा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी केलेल्या भाषणावर काही मत व्यक्त करायचं नाही. ही अराजकीय संस्था आहे. आम्ही घर सोडून इथे आत्मसंवादासाठी आलो आहोत,असे ते म्हणाले. तर रामकृष्णच्या एक विद्यार्थी म्हणाला, मी बेलूर मठ प्रशासनाला मोदींची भेट रद्द करण्याची विनंती केली होती. लोकांसमोर अडचणी निर्माण करणाऱ्या माणसांना बोलवायला नको,असे त्याने सांगितले.