मुंबई : माजी कृषी, पणनमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी लवकरच नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय तसेच तरुणांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी हा पक्ष कार्य करेल, असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद येथे आयोजित रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या पक्षाचे पहिले अधिवेशन हे एप्रिलमध्ये मुंबईत होणार असल्याचे सांगताना त्यांनी पक्षाचे नाव काय असावे, झेंडा कसा असावा हे जनतेनेच 15 दिवसांत सुचवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे अत्यंत निकटचे असलेले सदाभाऊ खोत युती सरकारच्या काळात त्यांच्यापासून दुरावले. स्वाभिमानी संघटनेची मुलूखमैदानी तोफ असी त्यांची ओळख होती. गत विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना युतीबरोबर होती. फडणवीस सरकारमध्ये सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. परंतु, सत्ता आल्यानंतर काही काळातच सरकारच्या धोरणावर टीका करत राजू शेट्टी यांनी युतीचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांनाही राजीनामा द्यायला सांगितले होते. मात्र, खोत यांनी राजीनामा न देता युतीत कायम राहण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर शेट्टी-खोत वाद राज्यात चांगलाच रंगला. सदाभाऊ यांनी नंतर रयत क्रांती संघटना स्थापन केली. राजू शेट्टी यांच्या प्रत्येक आंदोलनाची खोत यांनी नंतर खिल्ली उडवली. आता सदाभाऊंनी नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे.