Sadabhau Khot On Sharad Pawar| लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली असून राज्यासह देशभरात प्रचार सभांनाही वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण या काळात सुरूच आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरला, असे विधान करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार तुमची जात वेगळी असतील, तुमचं नाव फडणवीस असतं तर या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही हुंगले नसते, असे थेट विधान केल्याने सदाभाऊ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?
गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवारांसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार तुमची जात वेगळी असतील, तुमचं नाव फडणवीस असतं तर या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही हुंगले नसते. परंतु, देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की, तो शरद पवार यांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवार यांना खोटं बोलत रेटून चालावे लागत आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
आम्ही सर्व घटकपक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहोत. आमचा लढा होता तो सर्व सामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुख संपन्नता आणि आनंद असला पाहिजे. आम्हाला काय मिळण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय देणार ही भूमिका होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहील. आम्ही सर्व लहान घटक पक्ष भाजपसोबत आहोत. कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत, सगळे अलीबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीला या निवडणुकीत मुठमाती मिळणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.