मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नंतर आता एकनाथ खडसे यांनीही पक्षातील मेगाभरतीवर आणि पक्षातील सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. लोकांची पारख न करता भाजपमध्ये केलेल्या मेगाभरतीमुळे राज्यात भाजपची दुरवस्था झाली व हातची सत्ताही गेली, असा घरचा आहेर खडसे यांनी भाजपला दिला.
जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, निवडणुकीआधी भाजपमध्ये मेगाभरती करण्यात आली. चुकीच्या लोकांची मेगाभरती ही पक्षाला मारक असल्याचे पक्षात मी एकटाच जाहीरपणाने वारंवार सांगत होतो.
पक्षात आलेल्या या लोकांमुळे आपलीच सत्ता येणार याची खात्री बाळगून पक्षातील विशिष्ट चौकडीने माझ्यासारख्यांसह काही निष्ठावंतांना उमेदवारी दिली नाही. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनादेखील माझे मत पटले आहे, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी करायला नको होतो, असेही खडसे यांनी यावेळी म्हटले.