पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा काही महिन्यांवर आलेली असताना भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी जास्त चर्चिली जाऊ लागली आहे. त्यातही भारताच्या बॅडमिंटनमधील कामगिरीवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुरुषांच्या गटात काही खेळाडू पुढे येत असले तरीही महिलांच्या गटात मात्र आपल्याकडे एकही सक्षम पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. फुलराणी सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांचे पर्व जवळपास संपल्यात जमा आहे. अशा स्थितीत तिसरे नावही समोर येऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी काय असेल.
भारतीय क्रिकेटमध्ये जसे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे स्थित्यंतर घडले. त्याला पाहून देशात क्रिकेटची लाट नव्हे तर चक्क त्सुनामी आली. त्याच्याकडून प्रेरणा घेत देशातील विविध क्रिकेट अकादमी ओसंडून वाहू लागल्या. जे चित्र सचिनमुळे क्रिकेटमध्ये दिसू लागले तसेच काहीसे चित्र महिला टेनिसपटू सानिया मिर्झामुळे टेनिसमध्ये दिसू लागले. अगदी त्याच पाऊल वाटेवर प्रवास करत आधी सायनाने तर नंतर सिंधूने आपल्या नावाला वलय मिळवून दिले व त्यांच्याकडून प्रेरणा घेत देशात अनेक मुली बॅडमिंटनकडे वळल्या. मात्र, या दोघींची कामगिरी टोकियो ऑलिम्पिकपर्यंत सातत्याने सरस होत होती.
आता मात्र त्यांना आशियाई स्पर्धा तर सोडाच, पण जगभरात होत असलेल्या साध्या साध्या मालिकांमध्येही पहिल्या फेरीचे सामने जिंकणे कठीण होत आहे. सायनाने एक तर सिंधूने दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावले. मात्र, तरीही आता त्यांना एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. कित्येक वेळा तर सायनाने दुखापतीने असंख्य स्पर्धांतून माघार घेतली आहे. दुसरीकडे सिंधूला पहिल्या फेरीत किंवा फार तर उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आलेला आहे. मात्र, सीरिज स्पर्धेचे विजेतेपदही तिच्या आवाक्यात आता राहिलेले नाही. त्यामुळेच या दोघी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सायना जेव्हा यशस्वी होत होती, तेव्हाच तिला सचिन व सानियासारखे प्रसिद्धीचे वलय लाभले. मात्र, जे कर्तृत्व हे वलय सांभाळताना सचिन व सानियाने मेहनत घेतली ते सायनाला जमलेच नाही. प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर अनेकांचे पाय जमिनीवर राहात नाहीत, हाच अनुभव सायनाच्या बाबतीतही दिसून आला.
खरेतर महेंद्रसिंह धोनीप्रमाणे सायनाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा सायना नावाचाच बायोपीक प्रदर्शित झाला होता. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे त्यावेळी अनेकांना तो पाहता आला नाही. त्याचा सेकंड रनही प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट पाहूनही अनेकांची टीकाच सायनाला सहन करावी लागली. तिच्या खेळात जो स्पार्क होता तोच आता दिसेनासा झाला आहे.
देशाचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन व पुलेला गोपीचंद यांनी जागतिक बॅडमिंटनमधील मानाची समजली जात असलेली ऑल इंग्लंड स्पर्धाही जिंकली. मात्र, त्यावेळी आजच्यासारखे सोशल मीडिया नसल्याने ही कामगिरी जेव्हा वृत्तपत्रांतून छापून आली त्यानंतर त्याचे महत्त्व लोकांसाठी संपलेच होते. आता तसे होत नाही, कारण सोशल मीडियावर यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीचे कवित्व अनेक दिवस सुरू राहते व जवळपास प्रत्येकाच्याच स्मरणातही राहते.
सायनाने जेव्हा सुरुवात केली तेव्हापासूनच तिच्या नावाची चर्चा सुरू झाली. कारण तिने मुख्यत्वे या खेळावर असलेले चीन, जपान, थायलंड यांची मक्तेदारी संपुष्टात आणली व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवले. त्यावेळी खरेतर ती देशात सचिन व सानियाप्रमाणे घराघरात पोहोचली. पण तिच्या पाठीमागे लागलेल्या दुखापती, भारतीय बॅडमिंटनमधील राजकारण यांचा ससेमिरा तिच्यामागे लागला व तिच्या खेळाला ग्रहण लागले. पदुकोन अकादमी व गोपीचंद अकादमी यांच्यातील कोल्डवॉरचा फटका केवळ सायनालाच नव्हे तर आता सिंधूलाही बसत आहे.
एकीकडे खेलो इंडिया, टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम (टॉप) सारख्या योजनांना बळ मिळत असतानाही अंतर्गत राजकारणामुळे ज्या बॅडमिंटनपटूंचे नुकसान झाले. त्यात सायनाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. तिच्यासह त्यावेळची बेधडक वक्तव्यांबाबत प्रख्यात असलेल्या ज्वाला गुट्टालाही या खेळापासून किमान स्पर्धात्मक स्तरावरून दूर व्हावे लागले. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्या केंद्रांवर सध्या नुसती नजर टाकली तरी शेकडो खेळाडू केवळ बॅडमिंटनच नव्हे तर अनेक खेळात प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून जसा भक्कम सेकंड बेंच भारतीय क्रिकेट संघाला मिळाला तसा सेकंड बेंच बॅडमिंटनपासून अन्य कोणत्याही खेळाला मिळाला नाही, याचे वाईट वाटते.
काय करायला हवे?
हा विषय केवळ सायना किंवा सिंधूपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर या खेळात देशासाठी कामगिरी करण्याचे स्वप्न पाहात असलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचा बनला आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. देशात 140 कोटी लोकसंख्येत असे कितीतरी खेळाडू आहेत की ज्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. मात्र, आपल्या संघटनांचा रोख आपल्याच मर्जीतील खेळाडूंकडे असतो व त्यामुळेच आज भारतीय बॅडमिंटनची स्थिती बिकट बनली आहे. पुरुषांच्या गटात अनेक नामवंत खेळाडू पुढे आले आहेत. किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चीराग शेट्टी किंवा एच. एस. प्रणोय यांनी गेल्या दोन वर्षांत सातत्याने सरस कामगिरी केली आहे. यातील रांकीरेड्डी व चिराग जोडी तर जागतिक स्तरावरची सर्वात हिट जोडी ठरली आहे. तर एकेरीत लक्ष्य सेन जागतिक विजेताही ठरला आहे. मात्र, असे सगळे असूनही आपण या खेळात पाच वर्षांपूर्वीची मक्तेदारी का टिकवू शकलो नाही. भारतीय संघटनेनेच आता याबाबत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. केवळ अमुक एका प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळलो तरच देशाकडून खेळायला मिळेल असे वातावरण जे तयार झाले आहे त्याचे मळभ दूर झाले पाहिजे.
फिटनेसबाबत जागरूकता हवी
खेळाडूंना होत असलेल्या दुखापती व त्यातून बाहेर येत पुन्हा स्पर्धात्मक कामगिरी करणे हे मोठे आव्हान असते व भल्या भल्या खेळाडूंनाही ते जमत नाही. सिंधूने ते करून दाखवले. मात्र, सायनाला ते अद्याप जमलेले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी संघटनेने एक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसारखी योजना हाती घेतली पाहिजे. कारण खेळाडूला झालेली दुखापत केवळ त्याचेच नव्हे तर देशाचेही नुकसान करणारी ठरते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेली सिंधू व आता चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पराभूत झालेली सिंधू यांच्यात जमीन आस्मान इतका फरक जाणवला. तिची देहबोलीच नकारात्मक होती. काही वर्षांपूर्वी सायना ज्या कारणांनी वादात अडकली त्याच वाटेवरून आता सिंधूचा प्रवास सुरू झाला आहे. स्पर्धा कोणतीही असो सिंधूची विजयी सलामी, त्यानंतर सिंधू तिसऱ्या फेरीत आणि चौथ्या फेरीत सिंधूचे आव्हान संपले हेच पाहायला व वाचायला मिळते. आता तर त्याचाच इतका कंटाळा आला आहे की अनेक माध्यमे तिच्या कामगिरीची दखलही घेताना दिसत नाहीत व हाच खेळाडूचा उदय ते अस्त हा प्रवास ठरतो.
परदेशी प्रशिक्षक कशासाठी?
सध्या आपल्या विविध क्रीडा संघटनांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आला आहे. त्यातच यशस्वी खेळाडूंना अनेक वैयक्तिक प्रायोजकही लाभलेले आहेत. मग या इतक्या पैशांचे करायचे काय म्हणून देशातील नावाजलेल्या प्रशिक्षकांच्या जागी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करायचे व त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे हे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. याला वेळीच आळा घातला गेला नाही तर देशातील खरोखरचे उत्तमोत्तम प्रशिक्षक अडगळीत जातील. सायना व सिंधू या दोघींनीही हे प्रयोग करून पाहिले आहेत व त्याचा फटकाही आता त्यांना सहन करावा लागत आहे.
पॅरिसमध्ये काय होणार?
सिंधूने पुढील वर्षी फ्रान्समध्ये होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे. सायनाला अद्याप पात्रता मिळालेली नाही. येत्या काळात ज्या काही स्पर्धा होणार आहेत, त्यातून कदाचित ती देखील हा कोटा मिळवेल. पण मूळ प्रश्न हाच आहे की ऑलिम्पिक कोटा मिळाल्यावर तरी या दोघी कामगिरी कशी करणार. सायना अद्याप तंदुरुस्तीशी लढा देत आहे तर सिंधू प्रत्येक स्पर्धेतून हात रिकामे ठेवूनच मायदेशी परतत आहे. त्यामुळे आता या मोठ्या स्पर्धेला अद्याप नऊ महिने बाकी असल्याने आशा ठेवायला हरकत नाही. मात्र, या स्पर्धेतील अपयश या दोघींच्याही कारकिर्दीला पूर्णविराम देणारे ठरेल व सायना आणि सिंधू पर्वाचीही अखेर झालेली पाहायला मिळेल.
अमित डोंगरे